तीन हजार विद्यार्थ्यांना लष्करात सामील होण्यासाठी प्रोत्साहन

    27-Mar-2025
Total Views |
 
 ti
पुणे, 26 मार्च (आ.प्र.) :
 
भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‌‘युगांतर- 2047' या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांमधील तीन हजार एनसीसी विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेत भारतीय लळकर आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनिर्माणासाठी पुढाकार घेत या प्रेरणादायी सेमिनारचे आयोजन केले होते. युवक, योग आणि तंत्रज्ञान हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ असलेल्या या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये सखोल चर्चा झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल अनुप सिंघल (एव्हीएसएम, एस. एम, महासंचालक, सैन्यभरती, नवी दिल्ली) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
 ti 
 
यावेळी मे. जन. योगेश चौधरी, व्हीएसएम, एडीजी, झेआरओ-पुणे, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, आरएमडी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन, निवृत्त ब्रिगेडियर सौरभसिंह शेखावत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. ‌‘विकसित भारत' या संकल्पनेवर बोलताना लेफ्टनंट जनरल सिंघल यांनी भारतीय सैन्याच्या राष्ट्रनिर्माणातील महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला आणि युवकांनी सैन्यात भरती होऊन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. त्यांच्या प्रभावी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि जबाबदारीची जाणीव निर्माण केली. पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने आयोजित या सेमिनारमध्ये अनेक उपक्रम झाले. त्यात वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांकडून प्रेरणादायी व्याख्याने, करिअर मार्गदर्शन सत्र, भारतीय सैन्यातील संधींबाबत माहिती, एनडीए कॅडेट्सचे अनुभव, विशेष प्रेरणादायी भाषण ज्यात -जया किशोरी यांचे, शिस्त आणि चिकाटीचा महत्त्व पटवून देणारे व्याख्यान उपस्थित विद्यार्थ्यांना विशेष भावले.
 
 यावेळी सैन्य दलाच्या विविध शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक प्रदर्शन आणि आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाची झलक हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. प्रसिद्ध मेंटलिस्ट अमित कलंत्री यांचा ‌‘मन वाचण्याचा परफॉर्मन्स' सर्वांना अचंबित करणारा होता. शेवटी सबाली-द बँडच्या लाइव्ह म्युझिकल परफॉर्मन्सने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढवला. या उपक्रमामुळे भारतीय सैन्यात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या युवकांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाले. युगांतर-2047 हे केवळ एक सेमिनार नव्हते, तर भारताच्या तरुण पिढीला राष्ट्रनिर्माण आणि परिवर्तनाच्या आघाडीवर आणण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.
 
भारतीय लळकर ही केवळ नोकरी नाही, तर ती आपली जीवनशैली आहे. ती संकटाशी सामना करण्याची ताकद देते, जी लष्करातील प्रमुख सेनानींना घडवते; तसेच लळकरातील इतर कर्मचाऱ्यांना शिस्त लावते. भारताचे भविष्य हे नव्या ऊर्जेने तरुणांचा हातात येत आहे. त्यासाठी युगातंरसारखे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. ही प्रेरणा प्रथम स्वामी विवेकानंदांनी दिली आणि युवकांचे महत्त्व अधोरेखित केले.
-ले. जन. अनुप सिंघल, (महासंचालक, लष्कर भरती, नवी दिल्ली)
 
पुनीत बालन यांनी पुढाकार घेतल्याने युवा पिढीसाठी हा चांगला कार्यक्रम भारतीय लळकराला घेता आला. याची टॅगलाइन देखील यूथ आणि योगा या धर्तीवर असून, ती खूप सुंदर आहे. भारतीय स्वातंत्र्याला 2047 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी युगांतर-2047 हा उपक्रम दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही.
-मे. जन. योगेश चौधरी (व्हीएसएम, एडीजी, झेआरओ-पुणे)
 
आजच्या युगात तरुण पिढी समाज माध्यामांवरच जास्त भर देत आहेत.अशा वेळी त्यांना भारतीय सैन्यदलात करिअरच्या संधी किती आहेत.हे माहिती व्हावे म्हणून युगांतर 2047 या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय लष्कराला सोबत घेत आम्ही केले.यात सुमारे तीन हजार युवक -युवतींनी सहभाग घेतला.यातून किमान दहा टक्के जारी युवकांचे आयुष्य बदलले तरी हा समाधान होईल.यातून सैन्यदलाला नवे ऑफिसर नक्कीच मिळतील, अशी आशा वाटते.
- पुनीत बालन, अध्यक्ष, (पुनीत बालन ग्रुप)