ऐन उन्हाळ्यात पर्यटनाला जाण्याचा ट्रेंड वाढला

12 Jun 2024 22:59:53
 
 

trip 
उन्हाळा आणि काैटुंबीक पर्यटन असे भारतात जणू समीकरण आहे. शैक्षणिक संस्थांना सुट्या असल्याने हजाराे कुटुंबे बाहेरगावी जाऊन प्रवासाची मजा घेतात. मात्र, यंदाचा उन्हाळा जास्तच तीव्र असून, उत्तरेकडील राज्ये उष्म्याच्या लाटांबराेबर सामना करत आहेत. माॅन्सूनचे आगमन झाले असले, तरी ताे उत्तरेत पाेहाेचण्यास थाेडा अवधी आहे. राजस्थान हे सर्व पर्यटकांचे आवडते राज्य. या राज्यातील जैसलमेर हे शहर पिवळ्या वालूकाष्मांतील (सँड स्टाेन) इमारतींसाठी प्रसिद्ध असल्याने येथे कायम गर्दी असते.42 अंश सेल्सिअस तापमानात येथे राहणे सुखद नसले, तरी येथील प्राचीन हवेल्यांमध्ये राहण्यास पर्यटकांची पसंती आहे. व्यावसायिकांनी उन्हाळी पर्यटनावर सवलत दिल्याने पैसे वाचणे आणि आलिशान वास्तव्याचा अनुभव असा दुहेरी फायदा मिळताे.सूर्यगड हे येथील प्रख्यात आलिशान हाॅटेल.
 
थंडीच्या ऐन प्रवासी माेसमात या हाॅटेलच्या खाेल्यांचे सर्वसाधारण दर एका रात्रीच्या निवासासाठी 48 ते 55 हजार रुपयांदरम्यान असतात. उन्हाळा हा जैसलमेरचा पर्यटन हंगाम नसल्याने हे हाॅटेल या काळात बंद असते.यंदा मात्र त्याला अपवाद आहे. येथे वास्तव्याचे दर एका रात्रीसाठी 15 ते 16 हजार रुपयांपर्यंत आणण्याचा निर्णय व्यवस्थापनाने केला आहे. जुलैच्या अखेरपर्यंत ही सवलत मिळणार असून, स्पा, भाेजन आणि पेयांवरही सवलत दिली जाईल. ‘शापित गाव’ म्हणून ओळख असलेल्या कुलधारा या गावालाही तुम्ही भेटदेऊ शकाल. ‘जैसलमेरला येणारी विमाने बंद हाेत असल्यामुळे दर उन्हाळ्यात आम्ही सूर्यगड हाॅटेल बंद ठेवताे. मात्र, तरीही लाेक येथे येत असल्याचे आम्हाला दिसले. यंदाच्या उन्हाळ्यात हे हाॅटेल निम्मे भरलेले असणे उत्साहवर्धक आहे,’ अशी माहिती एमआरएस हाॅटेल समूहाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ यादव यांनी दिली.
 
याच ग्रुपचे बिकानेरमध्ये ‘नरेंद्र भवन’ हे आलिशान हाॅटेल असून, 1969मध्ये बांधण्यात आलेल्या हवेलीचे रूपांतर हाॅटेलमध्ये करण्यात आले आहे. यंदा तेथेही पर्यटकांची गर्दी असल्याचे त्यांनी नमूद केले.‘देशभरातील पर्यटक आता वेगळा अनुभव घेण्यास उत्सुक असतात. बिकानेरमध्ये पंजाब आणि दिल्लीतील पर्यटक ऑफ सिझनच्या वीकेंडला जास्त येतात. या काळात त्यांना आलिशान वास्तव्याचा अनुभव मिळताे,’ असे ‘नरेंद्र भवन’चे सरव्यवस्थापक हिमांशू भार्गव यांनी सांगितले. पर्यटनाच्या ऐन हंगामात (पिक सिझन) या हाॅटेलमधील खाेल्यांचे दर प्रतिरात्र 20 ते 25 हजार रुपयांदरम्यान असतात आणि सध्या ते प्रतिरात्र 7 ते 10 हजार रुपयांवर आले आहेत. जुलैअखेरपर्यंत ही सवलत राहणार असून, या काळात भाेजन, पेये आणि स्पा यावरही सवलत असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
 
हिवाळ्याच्या काळात पर्यटकांनी फुल्ल हाेणाऱ्या हाॅटेलात उन्हाळ्यात मात्र 40-50 टक्केच ऑ्नयुपन्सी असते. ‘नरेंद्र भवनमधील प्रख्यात स्पामध्ये आईला घेऊन येण्याची माझी इच्छा हाेती. पण, ऐन हंगामात येथे जागा मिळत नसल्याने ते जमत नव्हते आणि ऐन उन्हाळ्यात बिकानेरला येण्यास आई तयार नव्हती. मात्र, आता ती तयार झाल्यामुळे पैशांची बचत हाेण्याबराेबरच आम्हाला वेगळा अनुभवही मिळाला,’ असे नेहा मिश्रा या पर्यटक महिलेने सांगितले. उन्हाळ्यात थंड गिरिस्थानांवर जाण्याची मानसिकता असली, तरी काही पर्यटक उष्णतेचा ‘अनुभव’ घेण्यासाठी वाळवंटी भागातील शहरे-गावांनाही भेट देतात. मात्र, तेथे सर्व सुविधा मिळाव्यात ही त्यांची अपेक्षा असते आणि हा कल लक्षात घेत व्यावसायिक सज्ज झाले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात काेठे जावे, याचा शाेध पर्यटक आता नेटवर घेतात आणि त्यातील पहिल्या वीस ठिकाणांमध्ये राजस्थानातील उदयपूरचा समावेश असल्याचे ‘मेकमायट्रिप’ने नमूद केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0