तुका म्हणे नेत्रीं केली ओळखण । तटस्थ तें ध्यान विटेवरी ।।2।

12 Jul 2023 18:39:38
 
 

saint 
एखादा अनाेळखी व्यक्ती आपल्याकडे आला असता आपण त्याला आपण काेण? असे विचारताे किंवा एखदा आपणाला आपण काेण? असे विचारताे. खरे म्हणजे त्याच्या किंवा आपल्या सांगण्यातून आपली किंवा त्याची खरी ओळख पटतेच असे नाही. आपण जी ओळख करून देताे, ती या नाशवंत देहाची असते. खराेखर आपण काेण आहाेत? आपली कर्तव्य, जबाबदाऱ्या काय आहेत? या प्रश्नाची खरी उत्तरे आपणालाही माहिती नसतात. अर्थात खऱ्या अर्थाने आपणाला आपलीच ओळख झालेली नसते. त्यामुळे इतरांची खरी ओळख हाेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण संत महात्म्यांच्या बाबतीत असे घडत नाही.
 
त्यांना त्यांची खरी ओळख पटलेली असते. त्यामुळे इतरांची खरी ओळख पटवून घेण्यात त्यांच्या नेत्राकडून किंचितही कसूर हाेत नाही. ज्या डाेळयात ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेधाचा लवलेशही नाही, अशा तुकाराम महाराजांच्या डाेळ्यांना समता, बंधुता, निस्वार्थ प्रेम, नम्रता, कर्तव्य आदिचा संदेश देण्यासाठी समचरणी विटेवर उभा असलेल्या पांडूरंगाची ओळख खऱ्या अर्थाने पटली हाेती. त्यांचा हा स्वानुभव सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नेत्रीं केली ओळखण । तटस्थ तें ध्याने विटेवरी ।। जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
 
Powered By Sangraha 9.0