तुका म्हणे वाणी। परम अमृताची खाणी।।1।।

23 May 2023 12:53:58
 
 

saint 
 
वाचा ही मानवी जीवाला मिळालेली फार माेठी नैसर्गिक देणगी आहे. मानवाला माणूस बनविण्याचे हे फार माेठे माध्यम आहे.विचाराची देवाण-घेवाण, बुध्दीचा विकास हे सर्व कांही वाचेच्या माध्यमातून मानवाला शक्य झाले आहे. मानवी मनं जाेडण्याच्या या माध्यमाचा माणूस जेव्हा दुरुपयाेग करताे तेव्हा मात्र ही वाचा म्हणजे मानवी जीवाला जणू शापच मिळाला आहे, असे वाटते. चांगले बाेलावे म्हणून मार्गदर्शन करणारा माणूसही कधी कधी स्वार्थापाेटी या वाचेचा दुरुपयाेग करताे. ज्याला आपण काेण आहाेत ? आपण काय करायला हवे ? आपण काय करताे आहाेत ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत, असा महात्मा वाचेतून इतरांसाठी अमृतचा झराच वाहताे.
 
स्वार्थाला, अहंकाराला स्थानच नसेल तर समता, बंधुता, निस्वार्थ प्रेमाची आपाेआप जाेपासणूक हाेते. अशा जाेपासणूक करणा-यांची वाचा ही अमृताची खाणच असते. हे सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वाणी । परम अमृताची खाणी ।। सकारात्मक विचार, वर्तन करू गेलाे तर आपली वाचासुध्दा अमृताची खाणच हाेईल. प्रयत्न करुन पाहिला तर प्रत्यक्ष अनुभूतीही येईल.
जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0