गीता ही सर्व ग्रंथांची आई

23 Mar 2023 16:31:15
 
 

Gondavlekar 
गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे.गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या नि:श्वासातून निघाले, तर गीता ही त्याच्या म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघाली.गीतेचा विषय काेणता? गीतेचा विषय म्हणजे माेहाचा नाश करण्याचे तत्त्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या निवेचन, हा हाेय. गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला माेह झाला. याचा अर्थ असा की, त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले, आणि त्यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली. गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा माेह नाश पावला. याचा अर्थ असा की, कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्मांचे सुखदु:ख संपले. खराेखर गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वर महाराजांनीच. भारतीय युद्धामध्ये परमात्मा पीतांबर नेसून, अर्जुनाच्या रथावर बसून, रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले.
पुढे हजार वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी हाेय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे.‘मी मागे आहे, तू पुढे चल,’ हेच भगवंतांनी आपणा सर्वांना सांगितले आहे. एखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली, तर ताे समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वत:च्या लग्नाचे आणि त्यातल्या साेहळ्याचे विचार येतील; त्याचप्रमाणे, आपण पाेथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा.आत्मनिवेदन म्हणजे मी काेण आहे हे कळणे हाेय.प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदु:खे भाेगावी लागतात, त्यांमध्ये आपण असल्यासारखे दिसावे, पण खरे मात्र नसावे.
वकील जसा अशिलाचा खटला स्वत:चाच आहे असे समजून काेर्टामध्ये भांडताे, पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदु:ख मानीत नाही, वरून मात्र अशिलाजवळ दु:ख दाखविताे, अगदी असाच व्यवहार मी करताे. व्यवहार सत्य मानणाऱ्या लाेकांत वावरायचे असेल तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे. असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान न चुकू दिले की व्यवहार हा खेळ बनताे.कधी हार तर कधी जीत! आपण खेळात हरलाे काय आणि जिंकलाे काय, खऱ्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच.तरी खेळ खेळताना मात्र ताे जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा. भगवंताचे नाम घेतले की ही युक्ती आपाेआप साधते. म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगताे की, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम साेडू नका. नामाने चित्त आराम पावते. एक अनुसंधान ठेवा, इतर सर्व गुण आपाेआप मागे येतील.
 
 
Powered By Sangraha 9.0