काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते

17 Jan 2023 13:59:45
 
 

Gondavelakr 
 
सत्त्वगुणात भगवंत असताे, तेव्हा त्या मार्गाने आपण जावे.भगवंत आपल्यात यायला, सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली तरी ती भगवंतार्पण बुद्धीने करावी.व्यवहार साेडू नये, प्रयत्नही कसून करावा, परंतु त्याचबराेबर मन भगवंताकडे कसे लागेल इकडे लक्ष द्यावे. आपण किती परस्वाधीन आहाेत हे आजारी पडलाे म्हणजे समजते, तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे. काळजी न करतादेखील प्रयत्न हाेणार नाही असे नाही. उलट, प्रयत्न दुप्पट करावेत, पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे.आपण स्वत:बद्दल काळजी करताे याचे कारण असे की, आपण आपल्यापेक्षा जास्त दु:खी असलेल्या माणसाकडे पाहत नाही.
 
एक म्हणताे की, मला लाेकांच्या ‘देण्याची’ काळजी आहे; दुसरा म्हणताे की, मला लाेकांकडून माझे येणे ‘येण्याची’ काळजी आहे; तर तिसरा म्हणताे की, मला माझ्या मुलाबाळांची काळजी आहे, पण काळजीच्या या सर्व घाेटाळ्यामध्ये आपली स्वत:ची काळजी कुणालाच नाही! मागल्या आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करीत बसताे. ही काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गाेड लागत नाही, याला काय करावे? यावर रामबाण असा एक उपाय आहे; ताे म्हणजे, आजपासून काळजी करण्याचे अजिबात साेडून देऊन तेवढा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालविणे.
 
एका माणसाने माझ्यापाशी तक्रार केली की, ‘काय करावे, हा माझा मुलगा कशाचीच काळजी करीत नाही, नुसता हसतखेळत दिवस घालविताे; पुढे याचे कसे व्हायचे?’ मी म्हटले, ‘तुमचे म्हणणे वरवर खरे दिसते; पण वास्तविक पाहाता ते खरे नाही. तुम्ही इतकी काळजी करून काय मिळविले? शारीरिक आणि मानसिक त्रास भाेगला, आणि भगवंताला विसरला, इतकेच ना? मग तेच मुलाला का शिकविता? त्याने आपले कर्तव्य जरूर करावे आणि आनंदात राहावे; पण काळजी करू नये असेच मी त्याला सांगेन.’ तुम्ही प्रपंचाची काळजी करता ताेपर्यंत देवाची सेवा करता असे कसे म्हणावे? असू दे आणि नसले तर नसू दे, अशा मनाच्या अवस्थेत जाे राहील त्यालाच काळजी सुटेल.भगवंताला अशी प्रार्थना करावी की, ‘देवा, प्रारब्धाने आलेले भाेग येऊ देत, पण तुझे नामस्मरण चुकू देऊ नकाेस.’
Powered By Sangraha 9.0