तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ।।1।।

21 Sep 2022 15:30:40
 
 

saint 
 
आपल्या वर्तनावरून आपण चांगले किंवा वाईट ठरत असताे. वर्तन अयाेग्य असले तरी लाेकांनी चांगले म्हणावे असे माणसाला वाटतेआपणाला जाेपर्यंत आपण करीत असलेले कार्य, वाईट आहे असे वाटत नाही, ताेपर्यंत आपल्यात सुधार हाेणे कठीण आहे. समाेरच्याने आपली चूक, आपल्या निदर्शनास आणून दिली तर आपण त्यावर विचार करायला हवा. जा तुला काय करायचे आहे, असे म्हणणे चुकीचे असते. आपणाला लाेकांनी चांगले म्हणावे म्हणूनच आपण चांगले वागावे असे नाही, तर आपले वर्तन आपणाला मन:पूर्वक पटावे म्हणून आपण चांगले वागायला हवे. संसारात अडकलेल्या अनेक जीवांना स्वार्थ, अहंकार, काम, क्राेध, ईर्षा, द्वेष, मत्सराने घेरल्याने त्यांना दुष्कृत्यातून अजिबात बाहेर पडावे वाटत नाही.
 
काेणी सांगितले तरी त्यांचे ऐकावे वाटत नाही. दुष्कृत्यावर स्थिर असणाऱ्या अशा लाेकांवर काेणाच्याही मार्गदर्शनाचा, सहवासाचा परिणाम हाेत नाही. एखाद्यावेळी वज्र भंग पावू शकेल; पण हे वज्रापेक्षाही मनाने कठीण हाेऊन बसलेले लाेक वाईटत्व भंग पावू देत नाहीत, किंवा त्यांचे वाईटत्व काेणाला नष्ट करता येत नाही. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ।। जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0