गाेडी साखरेपासूनी । कैसी निवडते दाेन्ही ।।2।।

23 Nov 2022 14:41:30
 
 

saint 
संसारात अडकलेल्या जीवाला समाजाशी ऐक्य पावणे तर दूरच पण कुटुंबातही ऐक्य पावता येत नाही. त्याचे कारण म्हणजे हा जीव मी मध्ये गुरफटलेला असताे. जेथे मी आहे तेथे आप-पर, लहान-माेठा, स्त्री-पुरुष, उच-निच, गरीब-श्रीमंत, पात्र-अपात्र इत्यादी भेद येतात. ही भेदजन्यवृत्ती मानवाला ऐक्यापासून दूर नेते.मानवाचा मीपणा त्याला इतरांपासून तर दूर नेताेच पण खऱ्या अर्थाने त्याला स्वत:पासूनही दूर नेताे. इतरांचे तर साेडाच माणूस मी पणामुळे अर्धांगीणी म्हणून स्वीकार केलेल्या पत्नीशीही पूर्णत: ऐक्य पावत नाही.पती-पत्नी मिळून एक असे क्वचितच घडते.
 
पती-पत्नी जर एकमेकांशी ऐ्नय पावू शकत नसतील तर इतरांशी ऐक्य पावण्याची बाब दूरच राहील. इतरांशी ऐक्य पावण्याचा धडा प्रथमत: आपण आपल्या कुटूंबात गिरवायला हवा. पती-पत्नींनी एकमेकांचा आदर करावा, आपसात वाद-विवाद करू नयेत, मुळाबाळात फूट पाडू नये, आई-वडिलांची मानहानी करू नये, वडीलधाऱ्यांचा मानसन्मान करावा.इत्यादी मार्गाचा धडा गिरविला तर जीवमात्रांशी म्हणजे संतांच्या दृष्टिकाेनातील भगवंतांशी ऐक्य साधणे दूर नाही. जीवामात्रांशी ऐक्य साधणाऱ्याला ईश्वरभक्ती म्हणून वेगळे कांही करावे लागत नाही.जय जय राम कृष्ण हरी डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0