काळजीचे मूळ कर्तेपणात

20 Oct 2022 13:11:05
 
 
 
 
Gondavelakar
आनंद पाहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का ? नाही, जाे स्वत:च आनंदरूप आहे, त्याने आपण हाेऊन ‘मी दु:खी आहे’ असे मानून घेतले आहे. एकजण आपले ताेंड आरशात पाहायला गेला, पण त्याला ते दिसले नाही. त्यावर दुसरा एकजण म्हणाला, ‘मी दाखविताे.’ असे म्हणून आरशावर मळ बसला हाेता ताे पुसून त्याने आत पाहायला सांगितले, तेव्हा ताेंड स्वच्छ दिसले.त्याचप्रमाणे साधू लाेक करीत असतात. ते आपल्याला सांगत असतात की, तूच ब्रह्मरूप आहेस; म्हणजे तू स्वत:सिद्ध आणि आनंदरूप आहेस, परंतु; आपण काय करताे की, हा प्रपंच माझा आहे असे समजताे आणि त्यामुळे त्यातले सर्व सुखदु:ख आपण आपल्यावर लादून घेताे. वास्तविक आपल्या हाती काय आहे? परमात्म्याला काय करायचे ते ताे करीत असताे, आपण मात्र काळजी करून शीण करून घेत असताे.
 
म्हणूनच काळजी साेडून देऊन आपण भगवंताला शरण हाेऊन राहावे. आपण त्याचे हाेऊन राहिले म्हणजे आपल्याला सुखदु:ख हाेत नाही आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळताे. काळजी ही माेठी विलक्षण असते. एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नाेकरी लागावी याची काळजी हाेती. पुढे, त्याच्या मनाप्रमाणे नाेकरी लागल्यावर त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली. काही दिवसांनी लग्न झाले; मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली. नंतर तिला मूल हाेईना म्हणून काळजी लागली. काही दिवसांनी तिला मूल झाले; त्या मुलाला फीट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली. शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फीट बरी झाली; पण त्या म्हाताऱ्यालाच फीट्स येऊ लागल्या, आणि अखेर काळजी करीत करीतच ताे मरून गेला.
 
आपण काळाच्या स्वाधीन झालाे की आपली बुद्धी भ्रष्ट हाेते. खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे, आणि खुद्द कर्तेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे.व्यवहारी माणसे माेठी हुशार असतात; भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात! हा तर त्याच्याहीपेक्षा माेठा गुन्हा आहे. ‘काळजी लागणे स्वाभाविक आहे’ ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे. आपली काळजी का सुटत नाही? या प्रश्नाचे उत्तर अगदी साेपे आहे. काळजीने आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवताे, मग ती सुटणार कशी? ज्याने भगवंत आपलासा करून घेतला त्याला काळजीचे कारण उरत नाही.
Powered By Sangraha 9.0