असे पाहा, एखादा प्रवचन करणारा घ्या, किंवा माेठा वैदिक कर्मे करणारा घ्या; त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही, ताे असमाधानांतच असताे. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही, याचे कारण काय? तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते.आपण नीतीने वागताे ते लाेकांच्या भीतीने; कारण आपण वाईट वागलाे तर लाेक आपल्याला नावे ठेवतील. लाैकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही, कारण त्यालासुद्धा आपण करताे हे वाईट आहे असे वाटतच असते. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘देवापाशी काही न्याय नाही; ताे अगदी अन्यायी आहे.
’ मी त्याला विचारले,‘असे झाले आहे तरी काय?’ त्यावर ताे म्हणाला,‘मी कधी काेणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलाे, पण मी फक्त एकमजली घर बांधू शकलाे; आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमाेर दुमजली घर बांधले !’ मी मग त्याला विचारले,‘मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला?’ त्यावर ताे म्हणाला,‘मला तसे आवडत नाही; लाेक नावे ठेवतील.’ तेव्हा जे कर्म लाैकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही.प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करताे, आणि लाैकिकासाठी नीतिधर्माने वागताे; मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडे नेसले, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत ?
तसेच, जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयाेग हाेणार नाही. याउलट, देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जाे त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल.परमार्थ तीनपैकी काेणत्याही एका गाेष्टीने साधू शकेल. एक, देहाने साधूची संगत, दुसरी, संतांच्या वाड्.मयाची संगत आणि त्याप्रमाणे पुढे आचरण; आणि तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल.संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी; हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे.