याेगाने जे साधते ते नामाने साधते

    15-Nov-2022
Total Views |
 
 

Gondavlekar 
 
गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की, जाे काेणी काही मागायला येईल त्याला ‘नाही’ म्हणू नये; आपल्याजवळ जे असेल त्यामधले थाेडे तरी त्याला द्यावे.अन्न द्यायला कधीही मागेपुढे पाहू नये. पैसा देताना मात्र आपली परिस्थिती पाहून, आणि त्याचा हेतू पाहून, ताे मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे; पण ‘नाही’ म्हणणे चांगले नाही. भिकाऱ्याला कधीही वेडेवाकडे बाेलू नये. आपली नाेकरी हीही एक प्रकारची भीकच आहे! भिक्षा मागणे हे वैराग्याला कमीपणाचे नाही, पण भिक्षा ही स्वार्थासाठी नसावी. आपले पाेट भरल्यानंतर राहिलेल्या अन्नाचा प्रत्येक कण दुसऱ्याला द्यावा. वैराग्याचे तेज कधी लपून राहात नाही. अत्तरे वगैरे लावून तेज आणणे निराळे, आणि वैराग्याचे तेज निराळे. जगाचा स्वभाव कळणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. जे खाेटे आहे ते खरे मानणे, हे अज्ञान, अविद्या हाेय. खराेखर, मनुष्याची पारमार्थिक याेग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणे शक्य नसते. साधूंनाच अंतरंग समजते. म्हणून, तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कुणालाही नावे ठेवू नयेत.
 
अंतकाळी मनुष्य मनाच्या कशा अवस्थेत जाताे यावरून त्याच्या पारमार्थिक अवस्थेची कल्पना येऊ शकते. याेगाने जे साधते ते नामाने साधते यात संशय नाही. साधा मनुष्यसुद्धा नामाच्या याेगाने माेठ्या याेग्यतेला चढताे; अर्थात ते कळायला आपण स्वत: नामामध्ये मुरले पाहिजे. नामामध्ये ार सामर्थ्य आहे; कुणी त्याचा अनुभव घेऊन पाहात नाही, त्याला काय करावे? ज्याला नामाची चटक लागली त्याच्यावर रामाने कृपा केली असे निश्चित समजावे. परंतु नामाची चटक लागण्यासाठी, सतत नाम घेणे हाच उपाय आहे, तसे पाहिले तर प्रपंची माणसे अत्यंत स्वार्थी असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांचा स्वार्थ यत्किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असताे. हे कसे शक्य आहे? अत्यंत नि:स्वार्थी बनणे याचेच नाव परमार्थ.
 
ताे साधण्यासाठी थाेडा तरी स्वार्थ साेडायला आपण तयार व्हावे. साधुसंतांच्याकडे जाऊन हेच शिकायचे असते.प्रपंचावर सर्वस्वी पाणी साेडा असे कुणीच सांगत नाही, आणि असे सांगितले तरी कुणी ऐकत नाही. पण निदान प्रपंच, म्हणजे आपला स्वार्थीपणा, हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात ते काही गैर नाही.स्वार्थ कमी व्हायला वासना कमी झाली पाहिजे, वासना कमी हाेण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे, भगवंताची कास धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे, आणि त्याचे अनुसंधान टिकण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे. म्हणून तुम्ही नाम घेत जावे. ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडले.